नाशिक : राज्यात राजकारणात खासदार शरद पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीची चर्चा रंगत आहे. या भेटीबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी (दि. १८) प्रतिक्रिया व्यक्त करताना सामाजिक मुद्यावर दोन नेत्यांमध्ये भेट झाल्यास त्यात आक्षेपार्ह काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री भुजबळ यांची पाठराखण केली आहे.
गुरुवारी (दि.१८) रोजी नाशिक दौऱ्यावर आलेले मंत्री विखे-पाटील यांना याबाबत विचारले असता राजकारणात सध्या सत्ताधारी-विरोधकांनी एकमेकांची भेट घेऊ नये, असा नवीन पायंडा निर्माण झाला आहे. पण सामाजिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी राजकारण बाजूला ठेवत दोन नेते भेटत असल्यास त्यात आक्षेपार्ह काय आहे, असे ते म्हणाले. पवार-भुजबळ हे मोठे नेते आहेत. त्यांच्यामधील संवाद आपल्यासारख्या कार्यकर्त्याला समजण्यासाठी वेळ लागतो. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता भुजबळ यांनी पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेतले असू शकते, असा टोलादेखील विखे-पाटील यांनी लगावला.
प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली आदेशाच्या फाइलवर मीच स्वाक्षरी केली. परंतु, दिलीप खेडकर यांच्या चौकशीबाबत आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केलेल्या तक्रारींची दखल घेत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने चाैकशी सुरू केली आहे. परंतु, प्रशिक्षणावेळी कारवाई झाली असताना एखाद्या अधिकाऱ्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे विखे-पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी २० जुलैपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना विखे-पाटील यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. जरांगे-पाटील यांच्या सगेसोयरेच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाळगडासारखे प्रकार होत राहतील. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी विशाळगड येथे भेट देत पाहणी केली. त्यामुळे या मुद्यावर मी अधिकचे भाष्य करणे योग्य नसल्याचे विखे-पाटील म्हणाले.