Chhagan Bhujbal 
नाशिक

Ashok Kharat Case | "मलाही दिला होता खरातकडे जाण्याचा सल्ला!" छगन भुजबळांचा खळबळजनक खुलासा

Rupali Chakankar Resignation | मंत्री छगन भुजबळ : मलाही खरातकडे जाण्याचा दिला होता सल्ला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आध्यात्मिक शक्तीचा डामडौल आणि मंत्र-तंत्राचा बनाव करत महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव ठळकपणे समोर आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

आता त्यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गट महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद असून, त्याविषयी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मंत्री भुजबळ शनिवारी (दि. २१) नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले, खरात प्रकरणाविषयी बातम्यांमधून माहिती घेत आहे.

याविषयी फार काही माहिती नाही. निवडणुकीच्या काळात तिकडे जाऊ, असे आपले काही कार्यकर्ते सांगत होते. पण गेलो नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. काही चांगले साधूदेखील असून, ते चांगले काम करत आहेत. अशोक खरातकडे फार मोठी मंडळी येत होती.

रूपाली चाकणकर पुण्याच्या असून, त्यांना काय माहिती, त्यांना सुद्धा तिकडे कोणीतरी नेले असेल. त्या सातत्याने जात राहिल्याने चाकणकर यांना खरातने समितीवर विश्वस्त केले असेल. पण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधने पाळली पाहिजे. काही सीमा राखून ठेवल्या पाहिजे. आपण जे करतो त्याचा परिणाम जनतेवर होतो. कारण आम्ही पुढारी आहोत. मंत्री जातात, मग आपण जायला काय हरकत आहे, असे अनेकांना वाटते. खरातची पोलिस चौकशी करत असून, कारवाई होईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

पाणी मागितले तर दिले जाते

खरात अध्यक्ष असलेल्या मीरगाव येथील श्री शिवनिका संस्थानसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिली होती. याविषयी मंत्री भुजबळ म्हणाले, धार्मिक क्षेत्रात काम करणारे अनेक चांगले लोक आहेत. त्यांना पाणी देण्यात येते. पहिल्यांदा अशा प्रकारे निर्णय झालेला नाही. शक्य असेल तर पाणी देतो. कोणीही मागितले तर पाणी देण्याचा निर्णय होतो. तो माणूस पुढे जाऊन काय करेल हे त्या अधिकाऱ्यांना कसे माहिती असणार? त्यामुळे पाणी देण्याचा निर्णय गरजेनुसार झाला असावा.

माहिती घेऊनच राजीनामा

चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले, एखादा आरोप झाल्यानंतर त्यात किती तथ्य आहे, हे समजून घेतले पाहिजे. सुनेत्राताईंना आणि आम्हाला अनेक कामे असतात. त्यातून हे सर्व पाहायचे असते. सत्यता तपासल्याशिवाय राजीनामा घेणे योग्य ठरत नाही. माहिती घेतली असेल, चर्चा झाली असेल, तेव्हाच राजीनामा घेतला गेला. महिला आयोगाचे अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आहे.

राजकारण्यांनी बंधने पाळावीत

खरात याच्याकडे फार मोठी मंडळी येत होती. मात्र, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधने पाळली पाहिजेत, असा सल्लाही भुजबळांनी राजकीय नेत्यांना दिला. पोलिस आता चौकशी करत आहेत, कारवाई होईलच. ज्यांच्यावर अन्याय झाला असेल ते पुढे येतील. जे अधिकारी नेमले आहेत ते चौकशी करत कारवाई करतील, असेदेखील भुजबळ यांनी स्पष्ट केले.राजकारण्यांनी बंधने पाळावीत खरात याच्याकडे फार मोठी मंडळी येत होती.

मात्र, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधने पाळली पाहिजेत, असा सल्लाही भुजबळांनी राजकीय नेत्यांना दिला. पोलिस आता चौकशी करत आहेत, कारवाई होईलच. ज्यांच्यावर अन्याय झाला असेल ते पुढे येतील. जे अधिकारी नेमले आहेत ते चौकशी करत कारवाई करतील, असेदेखील भुजबळ यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT