

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
डिचोली मतदारसंघातील भेडसावणाऱ्या समस्येवर नागरिकांना पाणीटंचाईच्या कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलपुरवठा खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्या उपस्थितीत मुळगाव येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा सखोल आढावा घेऊन विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मतदारसंघातील ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित आहे, त्या ठिकाणी पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी एकूण आठ नव्या पाण्याच्या टाक्या उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच जुन्या आणि जीर्ण पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचे कामही हाती घेतली असून काही ठिकाणी पूर्ण झाले आहे.
यामुळे पाणीपुरवठा अधिक नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नागझरवाडा आणि पाचवाडा या भागांत टाक्यांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. गृहनिर्माण वसाहतीमध्ये उभारण्यात आलेली टाकी कार्यान्वित झाली असून तेथील पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
मेणकुरे लांट बारसे पुनर्वसन आणि इतर ठिकाणी चार नवीन टाक्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हरिजन वाडा आणि अडवलपाल येथे सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चुन विशेष टाकी उभारली जाणार आहे.
याशिवाय, मुळगाव येथील गावकरवाडा शिरोडवाडी येथे दोन टाक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, या सर्व योजनांमुळे पुढील ३० वर्षांसाठी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा उद्देश असल्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी सांगितले. दरम्यान, सुमारे ६० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेला २० एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा प्रकल्पकामं जोरात सुरू आहे. या प्रकल्पामुळे उंचसखल आणि पाणीटंचाई असलेल्या भागांपर्यंत पाणी पोहोचवणे शक्य होणार आहे.
पडोस प्रकल्प बंद राहिला तर सध्या काही भागांत दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या समस्या आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या टाक्यांची उभारणी आणि सुधारित पायाभूत सुविधा यामुळे ही समस्या लवकरच दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत आणि जलपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई व खात्याचे सहकार्य लाभत असल्याचेही आमदारांनी नमूद केले
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील
यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या विनंतीनुसार विशेष बैठक घेऊन सर्व समस्यांचा आढावा घेण्यात आला असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांना मान्यता देण्यात आली आहे. आगामी काही महिन्यांत टाक्यांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील पाणीपुरवठा नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.