इगतपुरी/घोटी : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे भावली धरण मंगळवारी (दि. २१) सकाळी शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागले. यंदाच्या मान्सूनला जवळपास महिनाभर उशिराने सुरुवात झाली असली, तरी अवघ्या २१ दिवसांच्या दमदार पावसात धरण भरल्याने जलसंपदा विभागासह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा सर्वप्रथम भरून वाहणारे धरण म्हणून भावली धरणाची नोंद झाली आहे. दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या आणि सुमारे दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या या धरणावर संपूर्ण परिसराच्या पिण्याच्या पाण्याची मोठी जबाबदारी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी (दि. २२) सकाळपासून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू असून, मागील २४ तासांत १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत १३०९ मिमी पाऊस झाला असून त्यामुळे भावलीसह भाम, मुकणे, वैतरणा, दारणा, कडवा आणि वाकी या धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागल्याचे चित्र आहे.
इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य भावली परिसरात दाट धुके, उंच धबधबे आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी होत आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसराचे सौंदर्य अधिक खुलले असून, निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्र ठरले आहे.
दरम्यान, घोटी शहरासाठी भावली धरणातून नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकर पूर्ण करून शहरवासीयांना नियमित, अखंड व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी भावली धरण ३ जुलै रोजी भरले होते, तर यंदा मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे धरण सुमारे १८ दिवस उशिराने ओव्हरफ्लो झाले आहे. यापूर्वी २०२३ मध्ये हे धरण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरले होते. त्यामुळे यंदाच्या पावसाने उशिरा सुरुवात होऊनही चांगली भरपाई केल्याचे चित्र दिसून येत आहे.
"भावली धरण शंभर टक्के भरल्याची पुष्टि केली. धरण भरल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले."— हरीश चव्हाण, माजी सरपंच, माणिकखांब