नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, अंधश्रद्धेच्या आड लपलेल्या फसवणुकीचे थर एकामागोमाग एक उलगडताना दिसत आहेत. विविध व्यक्तींना वेगवेगळे सल्ले देत त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचे आश्वासन देणाऱ्या खरातने काहींना तर विशिष्ट विधी करून घेतल्याचेही समोर आले आहे.
मात्र, या सर्व दाव्यांचा फोलपणा आता उघड होत आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर नगर परिषद निवडणुकीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या माध्यमातून अशोक खरातची भेट घेतली होती.
या भेटीत खरातने तुमचा विजय निश्चित असल्याचा ठाम दावा करत उमेदवारांना एक विशेष वस्तू दिली होती. माहितीनुसार एका प्लास्टिकच्या डब्यात तांदूळ, हळद, लिंबू ठेवून दिव्यावर ठेवलेल्या चिंचोक्यावर 'माझी शक्ती, आदिशक्ती' असा मंत्र लिहून देण्यात आला होता. हा विधी केल्यास विजय हमखास मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले होते.
या कथित 'दैवी उपायां' वर विश्वास ठेवून उमेदवारांनी त्या सूचनांचे पालन केले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत चित्र पूर्णपणे उलटे दिसून आले. विजयाची स्वप्ने रंगवणाऱ्या या उमेदवारांना पराभवाचा कडवा घोट प्यावा लागला. खरातच्या दाव्यांची हवा निघून गेल्याने संबंधित उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेमुळे खरातच्या भोंदूगिरीचा आणखी एक पैलू समोर आला असून, अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांची फसवणूक कशी केली जात होती, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, आणखी अशाच प्रकारचे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.