भोंदू खरात याचे सर्वपक्षीय संबंध असल्याचे आता ठोसपणे पुढे येत असून, विविध सत्ताकाळात त्याला मिळालेल्या शासकीय लाभांमुळे त्याची राजकीय व प्रशासकीय पकड किती मजबूत होती, हे स्पष्ट होत आहे.
दोन वेगवेगळ्या सरकारांच्या काळातही त्याला शासन दरबारातून विशेष सवलती आणि सुविधा मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे खरातचा प्रभाव केवळ धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून, तो थेट मंत्रालय आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला होता, हे अधोरेखित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फार्महाउससाठी खरातच्या जलसंपदा विभागाकडून अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ तो पाणीपुरवठा बंद केला.
मात्र, सुरुवातीला असा विशेष लाभ देण्यात आला यावरूनच त्याचे शासकीय पातळीवरील संबंध किती जवळचे होते, याची प्रचिती येते. सामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, एका भोंदू व्यक्तीसाठी असा विशेष निर्णय घेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता.
याचबरोबर, ईशान्येश्वर मीरगाव येथील मंदिरासाठी पर्यटन विभागामार्फत जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची बाबही समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे लाभ वेगवेगळ्या सत्ताधारी सरकारांच्या काळात देण्यात आले आहेत.
त्यामुळे कोणत्याही एका पक्षाशी नव्हे, तर सर्वपक्षीय नेत्यांशी त्याचे संबंध होते, असे चित्र निर्माण झाले आहे. भोंदू खरात याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी आणि राज्यकर्त्यांशी अतिशय निकटचे संबंध असल्याचे स्पष्ट होते. धार्मिकतेच्या आडून तयार केलेले हे जाळे आणि सत्तेच्या आशीर्वादाने मिळालेले लाभ यामुळेच त्याचे साम्राज्य इतके बळकट झाले, अशी चर्चा आता जोर धरत आहे.