देवळाली कॅम्प : विकासासाठी सत्तेत येण्याचा घेतलेला निर्णय व त्या माध्यमातून गरीब बहीण भावांना देण्यात येणारी मदत ही फसवी नसून तशी पवार घराण्याची संस्कृती नाही. रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात शासनाने जाहीर केलेली मदत दिली जाणार आहे. लाडक्या भावांना 14 ते 15 हजार कोटी रुपये वीजमाफीच्या माध्यमातून देताना युवकांनाही शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जाणार आहे. काम करून विकास साधने हा 'एकच वादा अजित दादाचा' असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद यात्रेला सुरुवात करताना देवळाली मतदारसंघातील लाडक्या बहिणीसोबत संवाद साधला. अतिशय उत्स्फूर्तपणे गर्दी झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी उपमुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले. व्यासपीठावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे , अनिल पाटील, सुरज चव्हाण, रूपालीताई चाकणकर, शिवाजी चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, आ. नितीन पवार, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, सविता तुंगार आदी व्यासपीठावर होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लाडक्या बहीण या योजनेत अडीच कोटी महिलांचे नोंदणी होईल अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत एक कोटी 75 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली असून एक कोटी 25 लाख महिला या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. केवळ लाडकी बहीण नव्हे तर लाडक्या भावाला देखील या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. सर्व प्रकारच्या वीजपंपांची वीज बिले माफ केली असून या कामी 14 ते 15 हजार कोटीची जबाबदारी सरकारने घेतली आहे. शिवाय गाईच्या दुधाचे अनुदानात वाढ करून विद्यार्थ्यांना स्टाईपेंड देताना नवीन कारखानदारीसुद्धा राज्यात आणून त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. गरिबांना मदत करणे हे चुकीचे आहे का? असा प्रतिप्रश्न करत महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवा, दिलेला शब्द पाळला जाईल हा अजितदादाचा वादा आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
देवळाली विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी 1300 ते 1400 कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून दिला आहे. अद्यापही आमदार सरोज अहिरे यांच्याकडून काही कामांची मागणी केली जात आहे. ती कामे देखील पूर्ण करण्याचा मी तुम्हाला शब्द देत आहे. विकासकन्या म्हणून त्यांचा नावलौकिक असल्याने विकासासाठी त्या कुठेही कमी पडणार नाही, याची मला खात्री असल्याचे उदगार त्यांनी काढले.
प्रास्ताविकातून आमदार सरोज अहिरे यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ संस्थानचा विकास आराखडा, पंढरपूर येथे संस्थेसाठी जागा, भगूर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 20 कोटींचा निधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासाठी निधीचा प्रश्न लवकरच सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देवळाली मतदार संघासाठी भरभरून निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. प्रारंभी आमदार अहिरे यांनी अजितदादा यांना त्यांच्या मातोश्रीच्या फोटोची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले.