नाशिकरोड : नाशिक विभागात काही ठिकाणी गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधारेमुळे दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बहुतांश भागांत अद्यापही समाधानकारक आणि सलग पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. परिणामी, विभागातील तब्बल ४५ टक्के क्षेत्रावर अद्यापही पेरण्या झालेल्या नाहीत.
बियाणे, खते, मशागत आणि मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची आणि दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जोखीम पत्करण्याऐवजी सलग व समाधानकारक पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पेरण्या उशिरा झाल्यास पिकांची वाढ, उत्पादन आणि बाजारपेठेतील नियोजनावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, नाशिक विभागातील २० लाख ३३ हजार २५४ हेक्टर सरासरी खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ११ लाख २३ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. म्हणजेच केवळ ५५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित ४५ टक्के क्षेत्र अद्याप पेरणीविना आहे. विभागातील नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांतील स्थिती सर्वाधिक चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीचे आवाहन केले आहे. पुरेसा ओलावा नसताना घाईघाईने पेरणी टाळावी, तसेच बियाणे आणि खतांचा योग्य वापर करावा, अशा सूचनाही विभागाने दिल्या आहेत.
पावसाचा खंड कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार मार्गदर्शन व कृषी सल्ला देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत समाधानकारक आणि सलग पाऊस झाल्यास उर्वरित पेरण्या वेगाने पूर्ण होऊ शकतील. मात्र, पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची, उत्पादनात घट होण्याची आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती आहे.
एक एकराची कोळपणी शंभर रुपयात
नगरसूल : येथील सेवानिवृत्त शिक्षक अंकुश निवृत्ती निकम यांनी वडिलोपार्जित शेती करताना समोर आलेल्या अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी केली. यात खरेदी केलेल्या यंत्राद्वारे कोळपणी करताना एका एकराला अवघे एक लिटर पेट्रोल लागते. त्यामुळे त्यांच्या खर्चात मोठी बचत होत आहे. बैलाने कोळपणी करण्यासाठी एकरी खर्च १६०० रुपये येतो. परंतु या कोळपणी यंत्राला केवळ १०० रुपये लागून दिवसाला ३ ते ४ एकर क्षेत्र कोळपणी केली जाते. त्यासाठी पाचशे रुपये रोजाने मजूर लावला तर अर्धी बचत होत आहे. या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वारेमाप खर्च न करता यंत्राच्या साह्याने शेतीची कामे करावीत, असे आवाहन निकम यांनी केले आहे. शासनाने मोठ्या ट्रॅक्टरप्रमाणे छोट्या ट्रॅक्टरांना व कोळपणी यंत्रालाही सोसायटीचे प्रभाकर जगन्नाथ कुडके यांनी केली आहे. अनुदान देण्याची मागणी विकास