नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
येथील पेट्रोलपंपासमोरील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीवर भरधाव जाणार्या ट्रकने वळण घेत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रकचे चाक दुचाकीवरील महिलेच्या अंगावरून गेल्याने चिरडून जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कानमंडाळे येथील अभिमान किसन जाधव (65), यमुनाबाई अभिमान जाधव (60) व त्यांची स्वरा दीपक जाधव (3) हे बुधवारी (दि.8) सायंकाळी मोटरसायकल (एमएच 15, जीजे 7085) चांदवड तालुक्यातील विटावे येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. चांदवड शहरातील पेट्रोलपंपासामोरील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीवर वळण घेत असतानाच नाशिककडून मालेगावकडे भरधाव जाणार्या ट्रक (यूपी 75, एम 4960) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेल्या यमुनाबाई रस्त्यावर पडल्या. त्याचcवेळी ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अभिमान जाधव व स्वरा जाधव यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.