नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील पंचवटी म्हणून नावलौकिक असलेल्या गांधी चौकात गजानन महाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात येणार असल्याने कळवण शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे.
कळवण शहरातील गजानन महाराजांचे निस्सीम भक्त व सेवेकरी जयंत नामदेव देवघरे यांच्या संकल्पनेतून गांधी चौकातील खासगी स्वमालकीच्या जागेत हे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. यामध्ये समाधी मंदिर व विष्णू मंदिराचादेखील समावेश आहे. समाधी मंदिरात ध्यानधारणा व पारायणासाठी व्यवस्थेचे नियोजन आहे. मंदिर उभारण्यासाठीचा संपूर्ण खर्च जयंत देवघरे स्वतः करणार आहेत. या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा भागवत सप्ताहाने दि. ११ ते १७ ऑगस्टदरम्यान होणार आहे. बुधवार (दि. १७)नंतर कुंभमेळ्याचे प्रमुख व सर्व आखाड्यांचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती महाराज व अन्य साधू-संतांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बांधकामानंतर साधारणत: दीड वर्षानंतर मंदिराचा लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी गुरुवार (दि.११) पासून सुरू होणाऱ्या भागवत सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.