उत्तर महाराष्ट्र

Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेले पोलिस अंमलदार ग्रामीण पोलिसांना सापडत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. दोन महिन्यांपासून ग्रामीण पोलिसांना परजिल्ह्यातील १६ पोलिस सापडत नसल्याने न्यायालयानेही याबाबत तालुका पोलिसांना विचारणा केली आहे. हे १६ पोलिस अंमलदार अर्जित रजा टाकून मोबाइल बंद करून अज्ञातस्थळी गेले आहेत. या पोलिसांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठीही प्रयत्न केलेला नसल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण पोलिस दलात आंतरजिल्हा बदल्यांसाठी एकवीस पोलिसांनी नातेवाइकांच्या गंभीर आजारांसह शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र सादर केले. मात्र, तपासणीत हे १६ प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्याने ग्रामीण पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात तथ्य आढळून आल्याने ऑगस्ट महिन्यात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात नाशिक व धुळे जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसह कर्मचारी, खासगी डॉक्टर व १६ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ महिला लिपिक, जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन, खासगी डॉक्टर व त्याचा सहकारी अटकेत आहेत. तर तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, डॉ. किशोर श्रीवास, लिपीक किशोर पगारे यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केले. मात्र, ते फेटाळले गेले आहेत. मात्र, १६ पोलिसांनी अद्याप न्यायालयात धाव घेतलेली नसल्याचे उघड झाले आहे. सोळा पोलिस रजेवर असून, त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावूनही ते हजर झालेले नाहीत. तालुका पोलिसांचे पथक संबंधित अंमलदारांच्या घरी वेळोवेळी जात आहेत. तेथे गेल्याचे अहवाल तयार केले आहेत.

मात्र, अंमलदार आढळून येत नसल्याने व त्यांच्या नातेवाइकांनाही कल्पना नाही. त्यामुळे ते बेपत्ता असल्याचा अहवाल तयार होत आहे. परिणामी, या पोलिसांसमोरील अडचणीत वाढ झाली असून, त्यांची रजा संपल्यानंतर कर्तव्यावर हजर झाल्यावर अटकेची शक्यता आहे. या प्रकरणी न्यायालयानेही पोलिसांना विचारणा केली असून, कायदा व सुव्यवस्था विभागानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत तपासी पोलिस पथकाने परजिल्ह्यातील पोलिस दलाशी संपर्क साधून बेपत्ता अंमलदारांना हजर करण्याबाबत पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.

कायदा व सुव्यवस्था विभागाशी पत्रव्यवहार

न्यायालयाने या प्रकरणात कायदा व सुव्यवस्था विभागाला पत्र दिले आहे. जळगाव, पालघर, बृहन्मुंबई पोलिसांकडेही नाशिक तालुका पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणी कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस निरीक्षक मिलिंद भारंबे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोळा कर्मचाऱ्यांचा एकत्रित शोध घेण्याची कार्यवाही सुरू होण्याची चिन्हे

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT