नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
प्रभाग क्रमांक 17 (नवा 22) मध्ये गेल्या महिन्यापासून भेडसावत असलेली डासांची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. डासांच्या निर्मितीला प्रमुख एक कारण असलेल्या टाकळीतील मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी व दुर्गंधी यावर उपाययोजना व्हावी म्हणून माजी नगरसेवक शैलेश ढगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी महापालिका आयुक्त रमेश पवार यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी या केंद्राची पाहणी केली.
उपआयुक्त मुंढे, आरोग्य अधिकारी आवेश पलोड, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, शिवाजी चव्हाणके, रमेश शिंदे, उदय धर्माधिकारी, बाजीराव माळी, मनोज मैद आदी अधिकार्यांनी पाहणी केली. शैलेश ढगे यांनी नागरी समस्या मांडल्या. माजी नगरसेविका सुषमा पगारे, रवि पगारे, गणेश बोराडे, संजय वरखेडे, योगेश कपिले आदी पदाधिकारी उपस्थित होते. टाकळीतील या केंद्राची दुर्गंधी जेलरोडपर्यंत पसरते. नागरिकांना राहणे अशक्य झाले आहे. दुर्गंधयुक्त पाणी या केंद्रातून सोडले जात असल्याने टाकळी ते जेलरोडच्या गोदावरीच्या पात्रात डासांची निर्मितीही वाढली आहे. यावर आयुक्त काय उपाययोजना करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले
आहे.