देवळा / मेशी : पुढारी वृत्तसेवा
देवळा तालुक्यातील दहिवड येथील भौरी मळा परिसरात शनिवारी (दि. 18) दुपारी 3 च्या सुमारास सुमारे 15 ते 20 मिनिटे गारा पडल्या.
पाऊस न पडता केवळ गाराच पडल्याने शेतकर्यांना आश्चर्य वाटले. मात्र, गारांमुळे कांदा, डाळिंब, गहू व डोंगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीमालाचा शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील खर्डे, शेरी, कणकापूर, वार्शी व हनुमंतपाडा परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कांदा या नगदी पिकाचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना सरकारकडून मदतीची आशा लागलेली आहे.