उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या ; ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक महानगर तसेच जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, लसूण, हरभरा, कांदा, गहू, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. त्यातून कसाबसा सावरत नाही. तोच अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक महानगरासह जिल्ह्यात धुमाकूळ घालत रब्बीच्या पिकांना जोरदार फटका बसला आहे. शेतातील द्राक्षपिकांना जोरदार फटका बसला आहे. साठवून ठेवलेला कांदाही भिजू लागल्याने कांदा उत्पादकही चिंतेत सापडले आहेत. हरभरा आणि गव्हाची काढणीचे काम सुरू असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ही पिके वाचविण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली आहे. आंब्याचे मोहोर गळून पडल्याने आंबा उत्पादकांनाही मोठी झळ बसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महानगर तसेच जिल्ह्यांतील पिंकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत आणि या घटकाला त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शिवसेना उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, कोअर कमिटी सदस्य डी. जी. सूर्यवंशी, उपमहानगर संघटक वीरेंद्रसिंग टिळे, दिलीप शिरसाठ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT