नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गडावर भाविक, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र, पोलिस चौकीत पोलिस कर्मचारीच राहात नसल्याने चौकी उभाण्याचा हेतू साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. गत आठवड्यात गडावर एका स्थानिकाची हैदराबाद येथील एका भाविकाबरोबरच हाणामारी झाली होती. त्यात महिला, पुरुष व लहान मुलांनाही बेदम मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे, तर काही महिन्यांपूर्वी चारचाकी वाहन जाळण्याचा प्रकार हा पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडला होता. यावेळीदेखील पोलिस चौकीत पोलिसच नसल्याने संबंधितांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न भाविकांसमोर आहे. गडावर खाकी वर्दीचा धाक नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
महिलांची सुरक्षा वार्यावर : गडावर हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यात महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकीत पोलिस निरीक्षक, हवालदार, महिला पोलिस असणे आवश्यक आहे.
अवैध मद्य, गांजा विक्रीचा सुळसुळाट : सप्तशृंगगडावर अवैध मद्य विक्री तसेच गांजा विक्रीचा सुळसुळाट सुरू आहे. याबाबत पोलिसांना महिती असूनही, कारवाईकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. नशेखोरांकडून महिलांना शिवीगाळ, मारहाण करणे, वाहनांच्या काचा फोडणे असे प्रकार घडत आहेत. बसस्थानक, शिवालय तलाव, उतरती पायरीजवळ हे टोळके बसलेले दिसून येते. या टवाळखोरांकडून धूम स्टाइलने दुचाकी चालवणे, रात्री उशिरापर्यंत गावातून ओरडणे सुरू असते. आपले कोणीच काही करू शकत नाही, या आवेशात हे टोळके वावरताना दिसते, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे.
पोलिस चौकी यात्रोत्सव काळात सुरू असते. मात्र, यात्रेनंतर चौकीला टाळे ठोकले जाते. गडावर भाविकांना मारहाण करणे, मद्यपींकडून शिवीगाळ, पाकीटमार, मोबाइल, दागिने चोरीचे प्रकार वाढले आहेत. – मधुकर गवळी, ग्रामस्थ, सप्तशृंगगड
पोलिस चौकीत कायमस्वरूपी दोन-तीन कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच रात्री 10 नंतर गावांमध्ये पोलिस गस्त होणे गरचेचे आहे. पोलिसांचा धाक नसल्याने येथे गुन्हेगारी वाढली आहे. – सुनील जगताप, भाविक, जळगाव