नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शासन विलीनीकरणासाठी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने संपकरी कर्मचारी कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी (दि.21) सायंकाळपर्यंत नाशिक विभागातील 93 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे एसटी प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर 487 कर्मचारी अद्यापही संपात कायम असून, त्यांना कामावर परतण्यासाठी शुक्रवारी (दि.22) अखेरची संधी मिळणार असल्याने विभागीय कार्यालयात कर्मचा-यांनी हजेरी लावली आहे.
तब्बल सहा महिने सुरू असलेल्या संपाबाबत उच्च न्यायालयाने संपकाळात करण्यात आलेली कारवाईदेखील एसटी प्रशासनाने मागे घ्यावी. तर संपकरी कर्मचार्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संपकरी कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावर परत येण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, लालपरीने पाचशे टप्पा पार केला असून, एसटीच्या दैनंदिन फेर्यांमध्ये वाढ झाली आहे. एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही पूर्वपदावर येऊ लागल्याने खाजगी वाहतूकीसाठी लागणारा आर्थिक खर्च वाचणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.