नाशिक (देवळाली कॅम्प) : भगूर परिसरात अज्ञात व्यक्तीने गायीची कत्तल केल्याने नागरिक संतप्त असून याबाबत चार दिवस होऊनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेसह विविध पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराज चौकात देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनचे व पोलिस निरीक्षक कुदंन जाधव यांना निवेदन देण्यात आले.
भगुर दारणा नदी पुलालगत चार दिवसांपूर्वी एक गाय व तीन वासरे मृत अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिस प्रशासनाने नागरिकांची समजूत काढत आरोपींना चार दिवसांत अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र चार दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने काल गुरुवारी (दि. 27) सकाळी विश्व हिंदू परिषदेसह विविध पक्षांच्या वतीने भगूर गावात मोर्चा काढण्यात आला.
शिवाजी महाराज चौकात पोलिस निरीक्षक जाधव यांना यांसर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एकनाथराव शेटे, लहु जिहाद संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके, हिंदू जनजागरण समितीचे रामसिंग बावरी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विनोद थोरात, मठ मंदिर समन्वय समितीचे कैलास देशमुख, हभप राहूल महाराज गायकवाड, सह बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, संदीप मुठाळ, नारायण गायकवाड, राहुरीचे सरपंच संगीता घुगे, शिवसेना शहराध्यक्ष विक्रम सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष प्रसाद आडके, मनोज कुवर, प्रमोद आंबेकर, काकासाहेब देशमुख, बजरंग दलाचे श्रीकांत क्षत्रिय, पुरुषोत्तम आव्हाड, नवनाथ ढगे, रमेश मानकर आदींसह विविध संघटनांचे समित्यांचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ संबंधित आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.