नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साहित्य कला व वाङ्मय क्षेत्रात १५ वर्षांचा अनुभव असणाऱ्या कलावंतांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे मानधन देऊन गौरविण्यात येते. नाशिक शहरातील पूर्ण जिल्ह्यातून कलाकारांनी दाखल केलेल्या ४०० पैकी १०० अर्ज मंजूर झाल्याची माहिती कलाकार मानधन समितीचे उपाध्यक्ष सुनील ढगे यांनी दिली.
साहित्य कलेसाठी आयुष्य वेचणाऱ्या कलावंतांच्या वृद्धापकाळात हालअपेष्टा होऊ नयेत म्हणून शासनाने राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना १९५४-५५ पासून सुरू केली आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या, कला क्षेत्रात १५ वर्षे कार्य करणाऱ्या तसेच दिव्यांगांना वयाची सवलत देण्यात आली आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये ५० हजारांच्या आत असण्याची अट आहे. जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाभरातून १०० कलावंतांची निवड करण्यात येते.
पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार जिल्हास्तरीय वृद्ध कलावंत निवड समिती गठीत करण्यात येते. डिसेंबर महिन्यात जाहिरात व अर्ज मागवण्यात येतात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अर्जांची छाननी करण्यात येते. निवड झालेल्या कलावंतांना एप्रिल महिन्यापासून मानधन सुरू करण्यात येते. गटविकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी याठिकाणी अर्ज दाखल करता येतो. या अंदाज प्रक्रियेला साधारण तीन महिने लागतात. साहित्य क्षेत्रातील पुरावे, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला अशी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
गट अ (राष्ट्रीय स्तरावरील कलाकार) ३१५० रुपये महिना
गट ब (राज्यस्तरीय कलाकार) १७२८ रुपये
गट क (जिल्हास्तरीय कलाकार) २२५० रुपये
१०० कलावंतांची मर्यादा असल्याने शहरातील प्रत्येक तालुक्याला महत्त्व द्यावे लागते. ५० टक्के लोकांच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्याने अर्ज नामंजूर केले जातात. या आकडेवारीत 'क' गटातील कलावंताची संख्या अधिक असते.
– सुनील ढगे, उपाध्यक्ष, कलाकार मानधन समिती
हेही वाचा :