उत्तर महाराष्ट्र

नाशिक : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील उद्योजकांनी शुक्रवारी (दि. २) पुकारलेला बंद उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. बंदला सुरुवातीपासून विरोधाचा सूर आवळणाच्या सिमा संघटनेनेसुद्धा बंदला आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करीत, उद्योजकांमधील एकजूटतेबाबतचा संभ्रम दूर केला.

निमा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह उद्योजकांच्या सुकाणू समितीतील पदाधिकारी डी. जी. जोशी, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, वरुण तलवार, निमाचे सरचिटणीस राजेद्र जोशी, सिमा संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी उपस्थित होते. यावेळी बेळे यांनी बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व उद्योजकांचे आभार मानले. त्याचबरोबर उद्योगवाढीसाठी आपला पाठिंबा असून, त्यादृष्टीनेच पुढील काळात विचार करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बंदबाबत उद्योजकांची जी मागणी असून, त्यावर आम्ही आजही ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत याविषयी चर्चा झाली असून, या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पोलिस आयुक्तांनीदेखील या प्रकरणातील १९ दोषींची सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेबाबत उद्योगमंत्री, पालकमंत्री, माजी पालकमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस, शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विचारपूस करून माहिती घेतली असून, संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच उद्योजकांनी बंद मागे घ्यावा, अशी मागणीही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बंद मागे घेतला जावा, अशी मागणी बेळे यांनी सुकाणू समितीला केली असता, समितीचे ज्ञानेश्वर गोपाळे यांनी बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

उद्योजकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सदैव ऋणी राहणार आहे. उद्योग वाढावा ही आमची भूमिका असून, ती कायम असणार आहे. उद्योगमंत्र्यांसह पालकमंत्री व अन्य नेत्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देताना बंद मागे घेण्यास सांगितले आहे…

-धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

सिमा संघटनेचा घूमजाव

बंदला सुरुवातीपासूनच विरोधाचा सूर आवळणाऱ्या सिमा संघटनेने मात्र घूमजाव केल्याचे दिसून आले. संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी यांनी मी बंदला विरोध केला नसल्याचे सांगताना आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. राठी यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल मात्र संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

उद्योगमंत्र्यांसोबत बैठक

या प्रकरणी ७ किंवा ८ जून रोजी मंत्रालयात उद्योगमंत्र्यांसोबत बैठक बोलविण्यात आली आहे. त्यास बेळे यांच्यासह सुकाणू समितीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत हल्ला प्रकरणी चर्चा केली जाणार असून, दोषींवर कारवाई व्हावी ही उद्योजकांची मागणी कायम असणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT