Humidity in Jalgaon
जळगाव : मागील २४ तासांत जळगावच्या हवामानात लक्षणीय बदल झाला असला तरी उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. कमाल तापमानात घट होऊन ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असले, तरी हवेतील आर्द्रता ७६ टक्क्यांवर पोहोचल्याने शहरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. परिणामी नागरिकांना घामाच्या धारा लागल्या असून दैनंदिन कामकाज करतानाही त्रास सहन करावा लागत आहे.
सोमवारी (दि. १६) वेधशाळेच्या अहवालानुसार कमाल तापमान ३७.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानाने विशी ओलांडल्याने रात्रीचा गारवा देखील कमी झाल्याचे जाणवत आहे. हवेतील आर्द्रता ७६ टक्क्यांपर्यंत वाढली असून पावसाची नोंद मात्र शून्य (००.० मिमी) राहिली आहे.
१३ मार्च रोजी तापमान ४०.१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र त्या तुलनेत आज तापमान कमी असूनही नागरिकांना अधिक उकाडा जाणवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता. हवेत ओलावा जास्त असल्याने शरीराला येणारा घाम लवकर सुकत नाही. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून पंखे आणि कुलरही अपुरे पडत असल्याची नागरिकांची भावना आहे.
किमान तापमानातही मोठी वाढ झाली आहे. १३ मार्च रोजी किमान तापमान १७.२ अंश होते, ते आता २०.७ अंशांवर पोहोचले आहे. म्हणजेच रात्रीच्या तापमानात सुमारे ३.५ अंशांची वाढ झाली आहे. परिणामी पहाटेपर्यंत जाणवणारा गारवा कमी झाला असून घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणांचा वापर वाढताना दिसत आहे.
हवेत ओलावा वाढल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले असले, तरी अद्याप पावसाची नोंद झालेली नाही. हवेत मोठ्या प्रमाणात बाष्प असल्याने पाऊस झाल्यास उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. अन्यथा पुढील दोन-तीन दिवस उकाड्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाढत्या आर्द्रतेमुळे डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.