Gulabrao Patil on Union Cabinet Expansion
जळगाव : शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने आता संसदेत शिवसेनेची ताकद १३ खासदारांची झाली आहे. त्यामुळे शिवसेनाच खरी मजबूत असल्याचे सिद्ध झाले असून, आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी दिल्लीतील राजकीय घडामोडींसह जिल्ह्यातील विविध विषयांवर भाष्य केले.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी नाव न घेता टीका केली. "जे यापूर्वी महायुतीच्या विरोधात लढले, त्यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार केला पाहिजे. आमच्याकडेही पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे," असे ते म्हणाले.
"ज्यांना राजकीयदृष्ट्या अपेक्षित यश मिळत नाही, ते आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पक्ष बदलतात," असा टोलाही त्यांनी लगावला.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्द्यावरून आमदार किशोर पाटील (पाचोरा) आणि आमदार मंगेश चव्हाण (चाळीसगाव) यांच्यात सुरू असलेल्या वादावर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. "या विषयावर अंतिम निर्णय महसूल मंत्री घेतील. दोन्ही आमदारांशी चर्चा करून हा वाद लवकर मिटविण्याचा प्रयत्न करू," असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या सरकार बदलण्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, "केवळ आंदोलन किंवा घोषणाबाजीमुळे सरकार बदलत नाही. जनतेचा विकास करणारे सरकारच टिकते. सध्या राज्य आणि देशात विकासाची कामे सुरू आहेत."
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, "आंदोलनाच्या ठिकाणी कोण गेले यापेक्षा सरकारचा प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि तोडगा काढणे महत्त्वाचे आहे."
केंद्रीय शिक्षण मंत्री तसेच पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. "राजीनामा मागताना कोणाचा राजीनामा मागत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. राजीनामा देणे किंवा घेणे हा सरकारचा निर्णय असतो," असे ते म्हणाले.
विद्यार्थी आंदोलनाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, "कोणतेही आंदोलन सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी आहे, असे न पाहता विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन सकारात्मक मार्गाने तोडगा काढला पाहिजे."