जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळ आणि मारहाणीच्या घटनेत अँजिओप्लास्टी झालेल्या ग्रामसेवक प्रल्हाद नारायण पाटील (५२) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सोमवारी (दि. १७) घडलेल्या या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
उर्वरित चार आरोपींना आठ दिवसांत अटक न झाल्यास जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या चाव्या पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्द करून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजू निकम यांनी दिला आहे.
तक्रारदार सुनील नारायण पाटील यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे मोठे भाऊ प्रल्हाद पाटील हे शिवरे दिगर आणि रताळे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. शिवरे दिगर येथील ग्रामसभेत सार्वजनिक मुतारीच्या दुरुस्तीच्या कामावरून वाद निर्माण झाला. यावेळी काही जणांनी गोंधळ घालत प्रल्हाद पाटील यांना घेरल्याचा आरोप आहे.
‘माझी अँजिओप्लास्टी झाली आहे, मला त्रास देऊ नका,’ अशी विनंती त्यांनी केली. मात्र, आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना बळजबरीने खुर्चीवर दाबून धरले. तसेच, शाम पाटील याने त्यांच्या छातीवर बुक्का मारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर घाबरलेल्या प्रल्हाद पाटील यांना छातीत वेदना जाणवू लागल्या. त्यांनी आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यांना प्रथम पारोळा आणि त्यानंतर धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात येत होते. मात्र, पारोळा येथील कुटीर रुग्णालयात डॉक्टरांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शिवरे दिगर येथील शाम प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, राहुल वाल्मीक पाटील, गोरख सयाजी पाटील, ज्ञानेश्वर बापू पाटील आणि भूषण सरदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींच्या अटकेची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे.
या घटनेमुळे ग्रामसेवक वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.