जळगाव : जिल्ह्यातील तरसोद ते चिखली हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. परंतु भादली येथील रेल्वे लाईन वरील ओव्हर ब्रीज या ठिकाणचा रस्ता खचला आहे. तर याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित अधिकारी कोणतीही दखल घेत नसून सर्रासपणे दुर्लक्ष करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आता 56 क्रमांक झालेला आहे. तरसोद पासून ते चिखली पर्यंत या महामार्गाचे सुस्थितीत चौपदरीकरण करण्यात आले तर अजूनही काही ठिकाणी कामे सुरु आहेत.
नशिराबाद जवळील भादली या गावाजवळील रेल्वे लाईनवर जाण्या येण्यासाठी ओव्हर ब्रिज बांधण्यात आला आहे. मात्र जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिजचे काम अजूनही सुरूच असल्याने वाहनधारकांना वन वे वाहतूक करावी लागत आहे. तर याच रस्त्यावर ब्रिजवरील रस्ता खचलेला असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांना खचलेला रस्ता दिसत नाही. त्यामुळे संभाव्य अपघाताची शक्यता आहे. तसेच पावसाळ्याचे दिवस सुरु असून रस्ता खचल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. रस्त्याच्या बाजूने पाणी निचऱ्यासाठी करण्यात आलेले छिद्रांमध्ये देखील गवत उगवले असल्याने पाण्याचा निचरा होतच नाही. परिणामी महामार्गावर पाणी साचल्यानंतर खचलेला रस्ता देखील दिसून येत नाही. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व संचालक शिवाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिसादच दिलेला नाही. त्यामुळे तक्रार कोणाकडे नोंदवावी असा प्रश्न वाहनधारकांसमोर उभा ठाकला आहे.