जळगाव : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेच्या निवडणुकीचा निकालासाठी एक दिवस बाकी असताना शहरातील एमआयडीसी भागात नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका व्यक्तीचा गळा चिरून खून झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.३) रोजी सकाळी उघडीस आली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
शहरातील नाथवाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी (वय-४५) हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. ते रविवारी (दि.२) रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास कामावरून सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने घरी येत होते. मात्र ते घरी न येता सोमवारी (दि.३) रोजी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेरील वाळूच्या ढिगा-यावर त्यांचा मृतदेह मिळून आला आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आहे. अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे घटनास्थळी पोहचले असून फॉरेन्सिक टीमचे नमुने घेण्यात आलेले आहे. तर पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा: