Jalgaon Election Results 2026: निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून अनेकदा वाद होतात. मात्र जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक असा निकाल समोर आला आहे, ज्यामुळे ईव्हीएमवर पुन्हा एकदा शंका घेतली जात आहे. कारण एका प्रभागात अपक्ष उमेदवाराला शून्य (0) मत मिळाली आहेत.
जळगावच्या प्रभाग क्रमांक 1-अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या सुनंदा भागवत फेगडे यांना एकही मत मिळालं नाही. सुनंदा फेगडे म्हणाल्या, “घरातले लोक, नातेवाईक यांचे मतं जाऊ द्या… पण मी स्वतः मला मतदान केलं होतं. मग ते मत कुठे गेलं?”
या निकालानंतर सुनंदा फेगडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आज लोकशाहीत मतदार बटन दाबतो, पण निकाल मात्र मशीन ठरवतं असं चित्र आहे. त्यांनी आरोप केला की, मतदार प्रश्न विचारतो तेव्हा निवडणूक आयोगाकडून ठोस उत्तर मिळत नाही.
फेगडे यांनी बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांचेही उदाहरण दिले. “ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकते,” अशी भूमिका मेश्राम वारंवार मांडत आले आहेत. जळगावमध्ये ‘शून्य मत' मिळाल्यामुळे त्याही आता ईव्हीएमचा विरोध करत आहेत.
फेगडे यांच्या मते, आज ईव्हीएमवर शंका घेतली, प्रश्न विचारला, तर लगेच “लोकशाहीवरच संशय घेतला” असा आरोप केला जातो. “मी माझं मत दिलं होतं, पण ते निकालात दिसत नाही. आयोग म्हणतो मशीन सुरक्षित. मग माझं मत अवैध ठरलं का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जळगावमधील या निकालामुळे सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणात निवडणूक प्रशासनाकडून नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातं, चौकशी होते का, आणि उमेदवाराकडून कायदेशीर पावलं उचलली जातात का, याकडे नागरिकांचं लक्ष आहे.