Child Marriage Case Bhusawal Jalgaon
जळगाव : भुसावळ येथील तेली समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या एका बालविवाह प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून, बालविवाह लावणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता हा विवाह सोहळा पार पडला. वधूचे वय केवळ १७ वर्षे ८ महिने असतानाही, कायद्याचे उल्लंघन करत हा विवाह लावण्यात आला. अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही जाणीवपूर्वक हा प्रकार घडवून आणल्याने बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग इंदलसिंग परदेशी (वय ४६) यांनी फिर्याद दिली.
या प्रकरणी वर दिनेश राजेंद्र तायडे (रा. भारत नगर, भुसावळ), त्याचे वडील राजेंद्र नारायण तायडे, आई रंजना राजेंद्र तायडे तसेच वधूचे वडील विकास पंडित डोळसे (रा. वराडसिम) आणि आई जयश्री विकास डोळसे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९, १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४ मे रोजी अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीएनएस क्रमांक २२२/२०२६ नुसार कारवाई केली.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जुबेर सिराज तडवी पुढील तपास करत आहेत.