जळगाव : जळोद-अमळगाव रस्त्यावर आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी धावल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मजूर घेऊन जाणारी एक ॲपे रिक्षा (MH 19 BJ 4365) अमळगावहून जळोदच्या दिशेने जात होती. दरम्यान, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टाटा मॅजिक(MH 19 CZ 2522) वाहनाने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा इतका जबरदस्त आवाज होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षा अपघातात अक्षरशः चुरडून गेली असून त्यामधील प्रवासी अडकून पडले होते.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी जखमींना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ॲम्ब्युलन्सच्या मदतीने अमळनेर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
जखमी मजूरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. काही मजुरांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून वाहतूक पूर्ववत केली.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक प्रशासनाने तपास सुरू केला आहे. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून चालकांचा कसून तपास घेतला जात आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे व प्रशासनाने वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
या अपघातामुळे दोन निष्पाप महिलांचे प्राण गेले असून अनेक कुटुंबांवर दु:खाचे सावट पसरले आहे. अपघातातील इतर जखमींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळण्याची प्रतिक्षा असून अधिक तपशील पुढील काही तासांत उघड होण्याची शक्यता आहे.