जळगाव : जिल्ह्याच्या पाणीपुरवठा, सिंचन आणि औद्योगिक गरजांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (दि. २५) चांगला पाऊस झाला आहे. धरण परिसरात मागील २४ तासांत १९ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस २४ मिमीपर्यंत पोहोचला आहे.
हतनूर धरणावर दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र, मध्य रेल्वेचे भुसावळ विभाग, भुसावळ नगरपालिका, यावल तालुका तसेच परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि सिंचन व्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागून असते.
धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात असलेल्या तापी नदीच्या उगम परिसरात आणि मध्य प्रदेशातील विविध भागांत समाधानकारक पाऊस झाला आहे. बऱ्हाणपूर येथे ८५.४ मिमी, देढतलाई येथे ६३.८ मिमी, लखपुरी येथे ४१.४ मिमी, अकोला येथे १.४ मिमी तर गोपालखेडा येथे ०.६ मिमी पावसाची नोंद झाली. या सर्व पर्जन्यमापन केंद्रांवर एकूण १९२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत धरणातील पाण्याच्या आवकेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या हतनूर धरणाची जलपातळी २१०.६१० मीटर असून धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४ मीटर आहे. धरणात एकूण २१८.४० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५६.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी उपयुक्त साठा ८५.४० दशलक्ष घनमीटर असून तो ३३.४९ टक्के इतका आहे. धरणाचे कोणतेही रेडियल गेट सध्या उघडण्यात आलेले नसून गेटमधून विसर्ग शून्य आहे. मात्र कालव्यामधून २.८३ क्युमेक्स (१०० क्युसेक) आणि आर.एस. गेटमधून २२.६५ क्युमेक्स (८०० क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्थेसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.