

कोल्हापूर : जिल्ह्यात धरणातील पाणीसाठा घटत चालला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजच्या दिवसाअखेर धरणात तब्बल 2.46 टीएमसी कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांत 16.99 टीएमसी इतके पाणी आहे. पाऊस वेळेवर सुरू झाला नाही, तर पुढील महिन्यात पाण्याचे संकट गंभीर होण्याची भीती आहे. यामुळे पाणी काटकसरीने वापरा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राधानगरी आणि दूधगंगा धरणातून भोगावती, पंचगंगा, दूधगंगा नदीसह गैबी बोगद्यातून कोल्हापूर, इचलकरंजी या दोन प्रमुख शहरांसह औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा होतो. अनेक गावांच्या नळ पाणी योजनाही या नद्यांवर आहेत. यासह शेतीलाही याच नद्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो.
दरवर्षी धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षीही पाण्याचे नियोजन केले आहे; मात्र यंदाच्या नियोजनावर अल निनोचा अधिक प्रभाव आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून, जुलैमध्ये पाऊस झालाच नाही अथवा कमी झाला, तरीही जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून 1 ऑगस्टपर्यंत एकूण 7 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहील, असे नियोजन केले आहे.