जळगाव : जळगाव जिल्हा हा मुख्यतः राजकारणी, केळी, कापूस या सर्व गोष्टींसाठी राज्यात ओळखला जातो. मात्र यंदा पावसाने अवकाळी पाऊस आणि नंतर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत शेतकऱ्यांच्या जीवनयात्रा संपविण्याचा आकडा 144 वर गेला आहे.
जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची गावापासून ते दिल्लीपर्यंत त्याची चर्चा होते. परंतु याच जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले असून, त्यांच्याकडे नेत्यांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये १४४ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपविले आहे. यामध्ये फेब्रुवारी, मार्च व जुलैत अनुक्रमे २३, २९, २३ अशा सर्वाधिक जीवनयात्रा संपविले आहेत.
जळगाव जिल्ह्यात कापूस, मका, सोयाबीन, तूर, केळी, सूर्यफूल, गहू हे प्रमुख पीके आहेत. केळीचे दर गेल्या दीड वषापासून घसरल्याने केळी शेती तोट्याची ठरली आहे. कापसाचा दर पाच हजारांच्या आसपास रेंगाळल्याने यंदा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कापूस शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी ठरला. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे पुन्हा जीवनयात्रा संपविण्याचे चक्र वाढले आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीसाठी ६८ जीवनयात्रा संपविणारे शेतकरी पात्र ठरले आहे. तर ५८ अपात्र ठरलेले आहेत तर जुलै व ऑगस्टमधील १६ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहे.