नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराची तहान भागविणार्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. सध्या या धरणात अवघा 36 टक्के पाणीसाठा असल्याने आवर्तन बंद करण्याच्या मागणीने तालुक्यात जोर धरला आहे.
करंजवण धरण चालू वर्षी 100 टक्के भरले होते. मात्र, सलग एक महिन्यापासून आवर्तन चालू असल्याने सध्या धरणात 36 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यातील कडक उन्हाचा विचार करता तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात करंजवणमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून पालखेड धरणात पाणीसाठा केला जातो. यांचा परिणाम कादवा नदीचे पाणीपात्र संपूर्णपणे कोरडे पडते. त्यामुळे कादवा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील धरणातील पाणीसाठा (टक्के)
पालखेड -64, ओझरखेड -57, तिसगाव – 48, करंजवण – 36, पुणेगाव – 35, वाघाड – 24
करंजवण धरणातून एक महिन्यापासून आवर्तन सुरू आहे. त्यामुळे धरणात फक्त 36 टक्के साठा शिल्लक आहे. भविष्यात स्थनिक जनतेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होऊ शकतो. धरणातून कादवा पात्रात एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले पाहिजे. स्थानिक पातळीवर टंचाई होणार नाही याची दखल घ्यावी. – जयदीप देशमुख, करंजवण