लासलगाव, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी साठवलेल्या ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरमधून साठा सोडण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर घाऊक बाजारात बाजारात कांद्याच्या सरासरी दरामध्ये प्रत्येक क्विंटल १३१ रुपयांची घसरण लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. शहरी भागात कांद्याच्या किरकोळ दरामध्ये भाव वाढताच कांद्याच्या दरावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी नाफेड आणि NCCF च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊन कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून साठवून ठेवलेला कांदा खुल्या बाजारात पाठविण्यास मंजुरी दिली. ग्राहकांचे हित लक्षात घेता टोमॅटो पाठोपाठ कांदा दर आवाक्याबाहेर जाऊ नये म्हणून केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
देशातील विविध ठिकाणी कांद्याचा दरही चढू लागला आहे. दरम्यान, संभाव्य स्थिती विचारात घेता कांदा टोमॅटोच्या मार्गाने जाऊ नये, यासाठी केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्राने आपल्या बफर स्टॉकमधून कांद्याचा साठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा कांदा हा मेट्रो शहरात टप्याटप्याने पाठविला जाणार आहे. मात्र या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसन्यास सुरवात झाली आहे.