Shalarth ID Scam
धुळे : शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या संस्था चालकांवर तातडीने कारवाई करावी आणि या प्रकरणात संशयित असलेल्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असे आव्हान शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. शिक्षण क्षेत्राबाबत सरकारला खरोखरच आस्था असेल, तर या प्रकरणात कठोर भूमिका घेऊन जनतेसमोर ती स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुद्दा गाजत असताना, या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या संस्था चालक आणि संबंधित नेत्यांची यादी आपल्याला मिळाल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी या यादीतील काही नावे पाहून धक्का बसल्याचे म्हटले आहे.
शासनाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी आणि अधिकार असलेल्या मंत्र्यांची किंवा सत्ताधारी आमदारांशी संबंधित संस्थांची नावे संशयितांच्या यादीत असल्याचा दावा गोटे यांनी केला. अनेक मंत्र्यांच्या आणि सत्तारूढ आमदारांच्या १० ते १२ संस्थांच्या शाखा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने या प्रकरणात काही गैर नसल्याचे मानले गेले, तरी नैतिकदृष्ट्या हा गंभीर विषय आहे,” अशी टीका गोटे यांनी केली. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात गैरप्रकारांचे आरोप असताना संबंधित व्यक्ती शासनाच्या निर्णय प्रक्रियेत कशा राहू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चौकशीच्या नावाखाली केवळ औपचारिकता करून संबंधितांना क्लीन चिट देण्याऐवजी या प्रकरणाची निष्पक्ष आणि कठोर चौकशी करावी, अशी मागणी गोटे यांनी केली. शालार्थ आयडी घोटाळ्यातील दोषी संस्था चालकांवर कारवाई करण्याबरोबरच संबंधित नेत्यांवरही कठोर भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले.
भाजपच्या आमदारांशी संबंधित ज्या संस्था या प्रकरणात दोषी किंवा अपात्र ठरतील, त्यांच्यावरही विनाविलंब कारवाई करावी. संबंधित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून आणि दोषी ठरलेल्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी गोटे यांनी केली. महाराष्ट्रातील जनतेला कधीतरी कळू द्या की, आपण केवळ पक्षाचे नव्हे, तर जनतेचे मुख्यमंत्री आहात, असा टोलाही गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.