Shirpur firing incident
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे लग्न पत्रिकेत नाव नसल्याच्या किरकोळ कारणावरून थेट मेहुण्यावरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भरतसिंग नगर येथे राहणारे योगेश उर्फ संदीप भगवान पाटील यांनी शिरपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. यात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. संदीप पाटील हे त्यांचे मित्र विशाल सोनवणे व प्रवीण कोळी यांच्यासह मारुती मंदिराजवळून जात होते.
त्याठिकाणी दबा धरून बसलेले सागर दगडू पाटील, हर्षल उर्फ मोंटी मछिंद्र रामोळे, भटू उर्फ भूषण गोपाल पाटील, सुनील उर्फ भावश्या दगा कोळी, विशाल राजेंद्र बाबर, अमोल गोपाल पाटील, गोपाल उर्फ चंद्रा रमेश चौधरी (सर्व रा. भरतसिंग नगर शिरपूर) व जयेश सुनील पाटील (रा. मराठा गल्ली, शिरपूर) यांनी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळीबार केला.
यात संदीप पाटील यांच्या डाव्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले, तर विशाल वसंत सोनवणे व प्रेम प्रवीण कोळी हे देखील जखमी झाले. याप्रकरणी वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सागर याच्यासह इतरांना ताब्यात घेतले. तर जयेश सुनील पाटील हा अद्याप फरार आहे. जखमी संदीप पाटील यांच्यावर शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या गुन्ह्यातील आरोपी सागर दगडू पाटील हा योगेश उर्फ संदीप भगवान पाटील यांचा शालक असून सागर याच्या बहिणीचा मृत्यू झाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरु आहेत. त्यातच संदीप यांच्या मुलीचा विवाह ठरला असून त्यात सख्ख्या मामाचे नाव नसल्याने या रागातून देखील हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यात शेतीचा वाद असल्याची माहिती पुढे आले असून यात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.