

धुळे : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. धुळे जिल्ह्यात आर्थिक वर्षात २५२ रुग्णांना सुमारे २ कोटी १९ लाख ६५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारी रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, संस्था आणि दाते यांचेही सहकार्य मिळत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे व गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले (बर्न) रुग्ण आणि विद्युत अपघात रुग्ण यांसारख्या एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार मिळणे सुलभ होणार आहे.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. याच कालावधीत धुळे जिल्ह्यातील २५२ रुग्णांना सुमारे २ कोटी १९ लाख ६५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
ही योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. जलद, पारदर्शक आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे पात्र रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत. गरजूंनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.