अक्कलपाडा धरणाच्या आवर्तनाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्या हस्ते जलपूजन करून प्रारंभ करण्यात आला.  Pudhari
धुळे

Dhule Water Crisis | धुळे ग्रामीणमधील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा; अक्कलपाडा धरणातून आवर्तन सुरू

दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात आणि जूनच्या पूर्वार्धात पाणीटंचाईची तीव्र समस्या

पुढारी वृत्तसेवा

Akkalpada Dam Water Release

धुळे : धुळे ग्रामीण मतदारसंघात दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात आणि जूनच्या पूर्वार्धात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होत असते. पूर्वी नियोजनाअभावी अक्कलपाडा धरणाचे आवर्तन केव्हाही सोडले जात असे. मात्र यंदा जिल्हा प्रशासन आणि आमदार राम भदाणे यांनी ऑक्टोबर महिन्यातच आवर्तनाचे नियोजन निश्चित केल्याने योग्य वेळी पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. या पूर्वनियोजनामुळे टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी सांगितले.

अक्कलपाडा धरणाच्या आवर्तनाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्या हस्ते जलपूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढत्या उन्हाच्या झळा आणि पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण मतदारसंघातील नागरिक तसेच पशुधनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी धरणाचे दोन दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून सुमारे ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

अनेक गावांच्या पाणीप्रश्नाला दिलासा

या आवर्तनाचा लाभ नेर, कुसुंबा, बिलाडी, वरखेडे, कुंडाणे, न्याहळोद, जापी, शिरडाणे, सातरणे, विश्वनाथ, सुकवड, मोहाडी (प्र. डांगरी), नूरनगर, अकलाड, मोराणे, मेहेरगाव, वार, कौठळ आदी धुळे ग्रामीणमधील गावांसह अमळनेर आणि शिंदखेडा तालुक्यातील काही गावांनाही होणार आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य टंचाईचा विचार करून सुमारे सहा महिन्यांपूर्वीच आवर्तनाबाबत नियोजन करण्यात आले होते. आमदार राम भदाणे यांच्या पुढाकारातून हे नियोजन प्रत्यक्षात आले असून त्यानुसार वेळेवर पाणी सोडण्यात आले आहे.

आवर्तन सोडण्याच्या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मयूर परदेशी, साक्री उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजिंक्य पाटील, कालवा निरीक्षक राकेश अहिरे व रवींद्र बोरसे यांच्यासह शंकरराव खलाणे, तुळशीदास अहिरे, भीमा गोयकर, विठ्ठल पाटील, पिंटू भास्कर, रमेश कारंडे, गंगाराम महारनर, गोरख कारंडे, कारभारी खलाणे, रवींद्र भदाणे तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT