धुळे : पुढारी वृत्तसेवा
देशात आणि जनतेमध्ये काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे हुकूमशाही सरकार विरोधात लढण्यासाठी काँग्रसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आता सज्ज व्हायचे आहे. काँग्रेस पक्षाचे दायित्व आपल्याकडे आले आहे. म्हणून काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहचवून पक्ष मजबूत करण्याचा लढा उभा करायचा आहे आणि काँग्रेसला मजबुत करायचे असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभेच्या सर्व जागा इंडीया आघाडी आणि महाविकास आघाडीच जिंकेल असा विश्वास उत्तर महाराष्ट्र विभाग आढावा बैठकीत व्यक्त करीत काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठकीचे धुळ्यात आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा निहाय आढावा-
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागतील प्रत्येक जिल्हयातील काँग्रेस पक्षाचा आढावा पहिल्या सत्रात घेण्यात आला. यावेळी धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर आणिक नाशिक जिल्हयातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपआपल्या जिल्हयातील पक्षीय माहिती दिली. जिल्हयातील तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, इंटक, एन.एस.यु.आय यांच्यासह सर्व फ्रंट ऑर्गनायझेशन आणि विविध सेलच्या पदाधिकार्यांशी प्रभारी चेन्नीथला तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चा केली. यावेळी कार्यकारणी विस्तार व पदाधिकार्यांच्या तत्काळ नियुक्त्या करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
दुपारच्या सत्रात धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक जिल्हयातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा या बैठकीत घेण्यात आला. पदाधिकार्यांना उद्देशून बोलतांना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी इडी, सीबीआय अशा यंत्रणांचा वापर करुन इंडीया आघाडी तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपाच्या हुकूमशाही विरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मेळाव्यात बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन काँग्रेस भूमिका मांडावी. संघटना मजबूत करावी. लोकसभा-विधानसभा जिंकण्यासाठी निवडणूक लढू आणि भाजपाला पायउतार करुन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसचे पन्नासवे राष्ट्रीय अधिवेशन खान्देशातील फैजपूर येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी इंग्राजांचा विरोध न जुमानता स्वातंत्र्याचा विचार या अधिवेशनातून पेरला गेला. त्यामुळे आता लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढायचे असल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी शेवटी सांगितले.
मेळाव्यात उपस्थित पदाधिकार्यानां उद्देशून बोलतांना विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजपाच्या कार्यपध्दतीतच दोष आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करुन ज्यांना भाजपाने भ्रष्ट्राचारी म्हटले त्यांनाच सरकारमध्ये घेतले. तसेच राज्यात काँग्रेसचा पाया मजबूत असून महाविकास आघाडीचे सरकार निश्चित स्थापन होणार आहे. त्यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले तर उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देवू अशी ग्वाही यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी दिली. आढावा बैठकिनिमित्त झालेल्या मेळाव्यात सहप्रभारी आशिष दुवा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ.हिरामण खोसकर, आ.शिरीष चौधरी, आ.के.सी.पाडवी, आ.पदमाकर वळवी, माजी खा.बापू चौरे, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रवक्ता राजू वाघमारे, भाई नगराळे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, प्रदिप राव, राजराम पानगव्हाणे, नाशिक युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील, माजी आ.डी.एस.अहिरे, माजी आ.वसंत सुर्यवंशी, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, हेमलता पाटील, विनायक देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तुषार शेवाळे, डॉ.अनिल भामरे, रमेश श्रीखंडे, ज्ञानेश्वर वाफारे, अॅड.आकाश छाजेड, दिलीप नाईक, शाम तायडे, शिरीष कोतवाल, करन ससाने, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक गुलाबराव कोतकर आदी उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.