पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील भाईंदर गावाच्या शिवारातील एका गोडावूनमधून वरई (भगर) व सोयाबिन असा तब्बल १ लाख ९२ हजारांचा माल चोरीस गेला आहे. दीड महिन्यांपूर्वी झालेल्या या चाेरीचे धान्य विकताना एक संशयित आढळून आल्याने पोलिसात फिर्याद देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे.
विजय पेंढारकर (रा. माळी गल्ली) यांच्या मालकीचे भाईंदर शिवारात धान्य गोडवून आहे. याठिकाणी त्यांनी वरई (भगर) व सोयाबिनचा माल साठवून ठेवला आहे. मात्र सुरक्षारक्षक नसल्याने गोडवूनमधून मालाची चोरी झाली. १ लाख ६२ हजार रूपये किंमतीचे २७ क्विंटल भगर व ३० हजार रूपये किंमतीचे क्विंटल सोयाबिन असा एकूण १ लाख ९२ हजाराचा माल चोरट्यांनी चोरला. हे चोरलेले धान्य एक संशयित व्यक्ती विक्रीसाठी नेत असताना त्याच्याकडे माल कुठून आला, असा प्रश्न उपस्थित झाल्याने पेंढारकर यांनी चौकशी केली. त्यातूून सदरचा माल चोरीचे असल्याचे समोर आले. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित भगर विक्रेत्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.