उत्तर महाराष्ट्र

धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावरून कोणताही वाद निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर आता पोलीस दलाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तयार करून वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नोडल ऑफिसर म्हणून उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा विभाग सर्व सोशल मीडियावरील मेसेजवर लक्ष केंद्रित करणार आहे.

राज्यभरात सोशल मीडियावरून अनेक वाद निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्हा देखील याला अपवाद नाही. सोशल मीडियावरून पाठवलेल्या मेसेजवरून अनेक वेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. हा प्रश्न हाताळण्यासाठी पोलीस विभागाची दमछाक होते. मात्र आता हा वाद होण्याच्या पूर्वीच संबंधित मेसेज पाठवणाऱ्याला अटकाव करण्याच्या हेतूने धुळे जिल्हा पोलीस दलाने पावले उचलणे सुरू केली आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी वरिष्ठांसमवेत चर्चा करून सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तयार केला आहे. या अंतर्गत हा विभाग फेसबुकसह व्हाॅट्सअप आणि सर्वच साइटवर लक्ष केंद्रित करणार आहे. या विभागाच्या नोडल ऑफिसर पदाची जबाबदारी उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना देण्यात आली आहे. या विभागामध्ये तांत्रिक ज्ञान असणारे तसेच सामाजिक कामांचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. या विभागाचा कार्यभार अधिक सुकर व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे आता भविष्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याच्या कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. या विभागाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT