उत्तर महाराष्ट्र

लासलगावी शिवनदीत आढळला मृत माशांचा खच ; मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

गणेश सोनवणे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
येथील ब्राह्मणगाव विंचूरच्या शिवनदीत मृत मासे आढळून आले आहेत. तर मृत माशांचा खच झाल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात मासे नेमके कशामुळे मेले? त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की, मानवनिर्मित कारणांमुळे मासे मेले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने घेतल्यानंतरच माशांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

ब—ाह्मणगाव शिवारातील साठवण बंधार्‍यात बुधवारी (दि.15) सकाळी मासे मृत झाल्याचे समोर आले. या साठवण बंधार्‍यात संपूर्ण लासलगाव पिंपळगाव नजीक गावांचे सांडपाणी सोडले जाते. त्यात पावसाच्या पाण्याची भर पडल्याने सांडपाण्याची दुर्गंधी आणखीनच पसरली तर पाण्याची पातळी वाढल्याने धरणाच्या भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत होणे, ही नदीच्या नैसर्गिक पर्यावरणीय व्यवस्थेच्या द़ृष्टीने धोक्याची घंटा आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात माशांचा खच झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, वातावरण दूषित होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून नदीत घाणीचे साम—ाज्य वाढल्याचे निर्दशनास येत आहे. नदीकाठावरील व्यावसायिक व नागरिक शिवनदीपात्रातच कचरा टाकत असल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

शिवनदीचे सौंदर्य वाढविण्यासाठी जलाशय योजनेतून पालकमंत्री यांनी 15 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. हा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केलेला आहे. सदरचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी काठावरील नागरिकांना व व्यावसायिकांना कचरा न टाकण्यासंदर्भात कडक नोटिसा दिल्या जातील.
– जयदत्त होळकर,
सरपंच, लासलगाव

साठवण बंधार्‍यातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने तत्काळ बंधार्‍याचा एक दरवाजा तोडून हे दूषित पाणी बाहेर सोडले जाईल. तसेच लासलगाव ग्रामपंचायतीला नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत काळजी घेण्याकरिता पत्र देण्यात आले आहे.
– भारती गवळी,
सरपंच, ब्राह्मणगाव
विंचूर

दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, बंधार्‍यात सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने शेतीपिकावरदेखील परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. विहिरी व बोअरला पाणी उतरल्याने पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपयोगी राहिलेले नाही. त्यातच पाण्याचा टीडीएसही वाढल्याने शेतीलाही त्याचा उपयोग होत नाही.
– सुनील गवळी,
शेतकरी, ब्राह्मणगाव

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT