संगमनेर: सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवीन प्रशासकीय इमारतीवर 50 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. वीज बचतीबरोबर भविष्यासाठी सौर ऊर्जेचा वापर हा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
येथील सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर उभारलेल्या 50 किलो वॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, संचालक विजय राहणे, गुलाबराव देशमुख, विलास शिंदे, योगेश भालेराव, सतीश वर्पे, मदन आंबरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, किशोर देशमुख, दिगंबर मुळे आदी उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले, कारखान्याने कायम शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जोपासले आहे. या कारखान्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे सर्वत्र विजेचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जा ही काळाची गरज बनली आहे.
नुकताच संगमनेर दूध उत्पादक संघाने दूध संघाच्या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. यामुळे वीज बचतीचा खर्च वाचणार असून त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार असल्याचे ते म्हणाले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. तर व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक
माजीमंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने पुढील 50 वर्षांचे नियोजन करून नव्याने 5500 मे.टन व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला. हा नवा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
विजेची बचत होणार
50 किलो वॅट क्षमतेचा हा ऊर्जा प्रकल्प आता कार्यान्वित झाल्याने कार्यालयीन दररोज 50 किलो वॅट वीज कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे सौर ऊर्जेच्या प्रकल्पामुळे विजेची मोठी बचत होणार आहे.