नगर: सोलापूरहून बसने अहिल्यानगरकडे येत असताना तारकपूर बसस्थानकावरुन एका दाम्पत्याचे 20 लाख रुपये किमती सोन्याचे दागिने अनोळखी युवतीने लांबविल्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. याबाबत तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या अनोळखी युवतीचा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, या चोरीप्रकरणी आरोपीचा तत्काळ शोध घेण्यात यावा तसेच दिवाळीची गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. (Latest Ahilyanagar News)
सुहासिनी अडोळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, अहिल्यानगर येथून मी, पती तसेच माझा मुलगा प्रशांत असे तिघे सोलापूरला गेलो होतो. माझ्या मुलाने सर्व सोन्याचे दागिने माझ्याजवळ दिले. मी ते बॅगमध्ये व्यवस्थित ठेवले. त्यानंतर मी व पती आम्ही दोघे 5 ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता सोलापूर येथील बसस्थानकावरुन बसमध्ये एकाच सीटवर बसून परत अहिल्यानगर येथे येत असताना सकाळी 11 वाजता बस अहिल्यानगर येथील माळीवाडा बसस्थानकात आली.
बसमधून काही प्रवाशी खाली उतरले तर काही बसमध्ये बसले. त्याचवेळी तोंडाला स्कार्फ बांधलेली 22 वर्षीय हिरव्या रंगाची साडी असलेली अनोळखी महिला माझ्या सीटजवळ येवून उभी राहिली. ती माझ्या पतीला म्हणाली, मला मळमळ होत आहे. मला जागा देता का, असे म्हणाल्याने माझे पती उठून त्यांनी महिलेला जागा दिली. माझ्या शेजारी बसल्याने मी माझ्याजवळील बॅग माझ्या मांडीवर घेतली. दरम्यान अकरा वाजता बस तारकपूर बसस्थानकावर आली असता ती अनोळखी महिला घाईघाईने बसमधून खाली उतरुन निघून गेली. त्यानंतर मी व माझे पती घरी बोल्हेगाव येथे गेल्यानंतर बॅगची चैन खोलून पाहिली असता बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाही. त्यावेळी मी माझ्या बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले असता मिळून आले नाही. आम्ही दोघांनीही दागिन्यांचा शोध घेतला असता सापडले नाहीत. माझ्या शेजारी बसलेल्या त्या अनोळखी महिलेनेच माझी नजर चुकवून माझ्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असे फिर्यादीत म्हटले. तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोल्हेगाव येथील रहिवासी सुहासिनी अडोळे यांचे सुमारे 20 लाख रुपये किमतीचे सोने होते. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांची आयुष्यभराची असणारी पुंजीची चोरी होते ही खेदजनक घटना असून, तत्काळ चोरट्यांचा शोध घेऊन आडोळे परिवाराचा मुद्देमाल शोधावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, सुनील भालेराव, राहुल कातोरे, सुदर्शन बनसोडे, विकी देठे, शिवाजी कळमकर, गोरख भिंगारदिवेआदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हा मुदृेमाल चोरीस
2 लाख रुपये किंमतीचे 5 तोळे गंठण, 1लाख 60 हजार रुपये किंमतीचे 4 तोळे मोठे गंठण, 60 हजार रुपये किंमतीचे दीड तोळा सोन्याचा लक्ष्मी हार, 40 हजार रुपये किंमतीचे 1 तोळा वजनाचा लक्ष्मी हार, 80 हजार किंमतीचे कानातील सोन्याचे झुबे, 40 हजार किंमतीचे 1 तोळा सोन्याचे दोन वेल, 20 हजार किंमतीची अर्धा तोळा सोन्याची चैन, 40 हजार किमतीच्या प्रत्येकी 1 ग्रॅम वजनाच्या 10 सोन्याच्या अंगठ्या, 2 लाख किंमतीच्या प्रत्येकी 1 तोळा वजनाच्या पाच अंगठ्या, 8 लाख 40 हजार रुपये जुन्या किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.