Tamasha Folk Art Maharashtra Pudhari
अहिल्यानगर

Tamasha Folk Art Maharashtra: तमाशा ही महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा; कलाकारांना शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे – डॉ. रावसाहेब कसबे

पद्मश्री पुरस्कारप्राप्त तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा संगमनेरमध्ये नागरी सत्कार

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर : तमाशा मनोरंजनाचे साधन असून तमाशा कलावंतांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करून अनुदान दिले पाहिजे. सरकारला कला नावाची गोष्ट कळत नाही. मात्र महाराष्ट्रात तमाशाने प्रबोधनाची बिजे रोवली असल्याचे प्रतिपादन ज्येेष्ठ साहित्यक, लेखक डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

संगमनेरकरांच्या वतीने रविवारी (दि.8) सायंकाळी कवी अनंत फंदी नाट्यगृहात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा नागरी सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, डॉ. सोमनाथ मुटकुळे, लोककला मंचचे संजय दळवी, हिरालाल पगडाल, एस.झेड. देशमुख आदिसह लोककलाकर उपस्थित होते.

डॉ. कसबे म्हणाले की, तमाशाने समाज क्रांती केली. तमाशाने महाराष्ट्रात प्रबोधनाचेे बीज रोवले. ती आद्य परंपरा आहे. हे मनोरंजनचेे साधन असून मात्र कलाकारांना मान सन्मान मिळाला पाहिजे. शासनाने एखादी योजना काढून त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. तमाशा कालावंत काम करत असताना त्यांना हाल आपेष्टा सोसाव्या लागतात. वाईट परिस्थिती जीवनन जगावे लागते. यासाठी शासनाने पुढे आले पाहिजे.शासनाला कला नावाची गोष्ट कळत नाही.

माजी मंत्री थोरात म्हणाले की, रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा तमाशा परंपरेचा तमाशा कलेचा सन्मान आहे. तमाशा फड सांभाळणे सोपे नाही, मात्र रघुवीर खेडकर यांनी तमाशा परंपरा जपली. पुरस्कार हा कलाकारांचा सन्मान आहे.तमाशा कलावंतानी समाज जागृतेी केली. स्वातंत्र्याची बीजे रोविण्यात कलाकारांचा मोठा वाटा आहे. कला सादर करताना पाठीमागे दुःख विसरून काम करावे लागते. रघुवीर खेडकर यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे. आयुष्यभर केलेल्या तमाशाच्या सेवेचा सन्मान आहे.

आ. सत्यजित तांबे म्हणाले की, तमाशा ही महाराष्ट्राची ओळख असून वेगवेगळ्या क्षेत्रात संगमनेरचे नाव पुढे जात आहे. पद्मश्री पुरस्कार मिळावा हे अनेकांचे स्वप्न असते. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने तमाशा कलेचा प्रथमच सन्मान देश पातळीवर झाला आहे.

उद्योगपती राजेश मालपाणी म्हणाले की, टाकीचे घाव सोसल्या शिवाय देव पण येत नाही.रघुवीर खेडकर यांनी तमाशा केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नामदेव गुंजाळ, सोमेश्वर दिवटे, नामदेव कहांडळ, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलकर यांनी केले.

‌‘सौ शहरी एक संगमनेरी‌’!

सत्काराला उत्तर देताना रघुवीर खेडकर म्हणाले की, वयाच्या नव्या वर्षापासून तमाशाच्या मंचावर बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तमाशात नवनवीन प्रयोग राबविले. माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली. आई स्व. कांताबाई सातारकर यांच्या संस्कारामुळेच तमाशा कला दिल्लीपर्यंत नेली. ‌‘सौ शहरी एक संगमनेरी‌’ हे दाखवून दिले. पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. चित्रपटातही काम करण्याची संधी आली होती. पण तमाशा सोडला नाही.तमाशा कलावंतांच्या शासनाकडून खूप अपेक्षा आहेत. हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी आई कांताबाई सातारकर पाहिजे होत्या असे सांगताना रघुवीर भावुक झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT