

संगमनेरः अपुर्ण जलजीवन योजनामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करताना, कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूर्व तयारी करावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी केल्या.
प्रांताधिकारी कार्यालयात शनिवारी टंचाईपूर्व नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे, जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंता शैलेजा डावखरे, जलसंधारण उपअभियंता व ग्रामपाणी पुरवठा अधिकारी उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात त्या कार्यान्वित झाल्या नाहीत. यामुळे निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने उपाययोजनांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
मागील वर्षी संगमनेर तालुक्यात केवळ 21 पाण्याचे टँकर सुरू होते, मात्र सध्या ज्या गावामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन योजना राबविल्या आहेत. सायखिंडी व पठार भागातील अनेक वाड्या-वस्त्यांना शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. सायखिंडी व पठार भागातील काही वाड्या-वस्त्यांमध्ये अद्याप जलजीवन योजना राबविली नाही. यामुळे अशा ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यास तत्काळ पाहणी करून, टँकर सुरू करावेत. याकामात कोणत्याही प्रकारची प्रशासकीय अडचण येऊ देऊ नये. जलजीवन योजनेचे काम पूर्ण दाखवले गेले असले तरी, प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नसेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
संगमनेर तालुक्यात ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज निर्माण होईल, त्या गावांचे प्रस्ताव तत्काळ तयार करा, असे आदेश दिले आहेत. टंचाई काळात तालुक्यातील कोणत्याही गावातील नागरिक पाण्यापासून वंचित राहू नये, याची संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी तातडीने दूर करून, आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर सुरू करावेत. नागरिकांना पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे, तो हक्क अबाधित राहिला पाहिजे.
आमदार अमोल खताळ, संगमनेर