

नगर: शेतकरी ते ग्राहक हा धागा मजबूत होण्यासाठी ‘कृषी पर्व’कृषी महोत्सव वर्षातून दोनदा खरीप व रब्बी हंगाम अखेरीस होण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे आश्वासन पुणे कृषी विभागाचे नियोजन व प्रक्रिया संचालक विनयकुमार आवटे यांनी दिले. दरम्यान तीन दिवसांत कृषी महोत्सवातील उलाढाल 2.23 कोटींची झाली आहे.
कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन जिल्हा परिषद आणि एक्सपो ओशियनकंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगरात कृषी महोत्सव सुरु आहे. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.7) संचालक विनयकुमार आवटी यांनी भेट दिली. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये अहिल्यानगर जिल्हयाने खूप उत्कृष्ट कामकाज केले आहे. त्याचा परिपाक म्हणून नगर जिल्हयातील 102 पी.एम.एफ.एम.ई. योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी विक्रीसाठी प्रक्रिया उद्योगाचे कृषीपर्व महोत्सवात स्टॉल उभारु शकले असल्याचे त्यांनी नमूद केले.
या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांचा समन्वय दिसून आला असल्याने खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात असे प्रदर्शन होण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन संचालक आवटे यांनी दिले.
या महोत्सवामध्ये कृषि विभागामार्फत बचत गट व शेतकरी यांनी धान्य, फळे व भाजीपाला प्रक्रिया केलेला उत्पादित माल तसेच महिला बचत गटांनी तयार केलेले शेती मालापासून तयार केलेले विविध पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. जामखेड व कर्जत तालक्यांतील चविष्ट ज्वारी विक्रीस ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या या सर्व मालाची उलाढाल 2.23 कोटींची झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. दरम्यान, शनिवारी दिवसभरात आयोजित विविध चर्चासत्राला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानअंतर्गत स्वयं सहायता बचत गटाने तयार केलेली उत्पादने व चटपटीत अस्सल गावरान खाद्य पदार्थांची विक्री, पौष्टिक तृणधान्य पासून बनविलेल्या खाद्य पदार्थांची विक्री या महोत्सवामध्ये सुरु आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध जातीच्या जनावरांचे प्रदर्शनही आयोजित केलेले आहे.