शशिकांत पवार
नगर तालुका: दुष्काळजन्य पर्जन्यछायेचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर तालुक्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संसारासाठी बांधावरील चिंचेचे वृक्ष आधारवड ठरत आहेत. दुर्लक्षित केलेल्या चिंचेच्या वृक्षांपासून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असून चिंचेच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होत आहे. चिंचेच्या व्यवसायातून ग्रामीण अर्थकारणाला मोठी चालना मिळत असल्याचे चित्र तालुक्यांमध्ये पाहावयास मिळते.
ग्रामीण भागात बांधावर असलेल्या चिंचांच्या झाडांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा आधार मिळत आहे. शेतीसोबतच चिंचेच्या व्यवसायातून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत असून अनेक कुटुंबांच्या संसाराला यामुळे हातभार लागत आहे. शेतीच्या बांधावर अनेक वर्षांपासून असलेली चिंचांची झाडे वर्षानुवर्ष शेतकऱ्यांसाठी उपयोगाची ठरत आहेत. मार्च -एप्रिल महिन्यात चिंचेचा हंगाम सुरू होताच गावोगावी चिंच तोडणीला वेग येतो. काही शेतकरी स्वतः घरीच चिंचा फोडून विक्री करतात तर काही जण व्यापाऱ्यांना झाडांचा ठेका देतात. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. चिंचेला बाजारात चांगली मागणी असून चिंचोके ही बाजारात विकले जात आहेत.
तालुक्यातील शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध नसल्याने येथील शेतीला नेहमीच वातावरणाच्या बदलाचा फटका बसत असतो. पर्यायाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी चिंचेच्या विक्रीतून मोठा दिलासा मिळत आहे. गावातील महिलांनाही चिंच फोडणे, स्वच्छ करणे, वाळवणे या कामातून रोजगार उपलब्ध होतो तर तरुणांना चिंच झोडण्यातून रोजगार उपलब्ध होत आहे.
चिंच विक्रीचा छोटा व्यवसाय ग्रामीण अर्थचक्राला चालना देणारा ठरत आहे. बाजारामध्ये चिंचेला साधारणपणे 9 हजार ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळत असून चिंचोके देखील दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात आहेत.
शेतकऱ्यांच्या बांधांवर झाडांचा ठेका घेतला जातो. त्यामधून चिंचा झोडण्यासाठी तरुण तर चिंचा गोळा करणे, फोडण्यासाठी महिलांच्या हातांना रोजगार मिळतो. उन्हाळ्यात चिंचेचा हंगाम असल्याने उष्णतेत काम करणे मोठे अवघड जाते. शेतकऱ्यांबरोबर ग्रामीण भागात रोजगार व व्यापाऱ्यांना देखील दोन पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.तौफिक शेख (चिंच व्यापारी)
अतिवृष्टी व कांद्याचे गडगडलेले भाव यामुळे शेती तोट्यात गेली. मोठा खर्च करून देखील उत्पन्न हाती आले नाही. बांधांवरील चिंचांच्या झाडांच्या विक्रीतून सुमारे वीस हजार रुपयांचे उत्पादन हाती आले. त्यामुळे संसाराला मोठा हातभार लागला आहे. कोणताही खर्च न करता चिंचेच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.सुधीर पवार, (शेतकरी, जेऊर)