Shrirampur Unseasonal Rain Crop Damage Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Unseasonal Rain Crop Damage: श्रीरामपूरमध्ये अवकाळी पावसाचा फटका; 671 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

745 शेतकरी बाधित; कांदा पिकांचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी वाढली

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: मार्च-एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 745 शेतकऱ्यांना तडाखा बसला असून सुमारे 671.49 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच नगदी पीक म्हणून कांदा पिकाचे मोठे क्षेत्र असले तरी श्रीरामपूर तालुक्यात नुकसान होऊनही कांदा पिकाचे पंचनामे शासकीय यंत्रणेमार्फत केले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

श्रीरामपूर तालुक्यात मार्च व एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भागात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, मका, भाजीपाला, डाळिंब बागा, टरबुज, द्राक्ष, आंबा बाग यासह अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली होती.

आमदार हेमंत ओगले यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पिकांचे पंचनामे करण्याची सूचना महसूल प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे महसुल व कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. तालुक्यात एकूण 745 शेतकऱ्यांचे 671.49 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आतापर्यंत 413.96 हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहे.

अद्यापही 250 शेतकऱ्यांच्या 249.98 हेक्टरवरील पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेजारच्या तालुक्यात रब्बी हंगामी गहू, कांदा पिकांच्या नुकसानीचे सरसगट पंचनामे सुरु आहेत असे सांगितले जाते,असे असताना मात्र श्रीरामपूर तालुक्यात केवळ गहू पिकांचे पंचनामे सुरु आहेत.

कांदा पिकांचे पंचनामे केले जात नसल्याचे शल्य आहे. त्यामुळे आ. ओगले यांनी याप्रकरणी लक्ष घालुन कांदा पिकांचे पंचनामे करण्यासाठी सरकारी यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे राहिले असतील, अशा संबंधित शेतकऱ्यांनी गावपातळीवर तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार श्रीरामपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT