श्रीरामपूर: येथील पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्याच्या ग्रामीण भागात 10 हजार 570, तर शहरात 506 एकल महिलांची नोंद झाली आहे. तसेच शहरात लवकरच प्रभागनिहाय फेर सर्वेक्षण केले जाणार आहे. श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वरील माहिती देण्यात आली.
या बैठकीस प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे, अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, शिक्षण विभागाच्या वंदना गिरमे, तालुका संरक्षण अधिकारी दिपाली भिसे, तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकुन अभया राजवळ, श्रीरामपूर नगरपालिकेचे समुदाय संघटक हरीष पैठणे, तालुका आरोग्याधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक एस. व्ही. काकडे, उमेदचे तालुका व्यवस्थापक के. के. शेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदस्य सचिव शोभा शिंदे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत एकल महिलांच्या सर्वेक्षणास गती देण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत अहिल्यानगर येथील नागरी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत शहरातील 30 अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार नगरपालिका हद्दीत 506 एकल महिलांची नोंद झाल्याचे पालिकेचे समुदाय संघटक हरीष पैठणे यांनी सांगितले.
फक्त अंगणवाडीच्या परिसरातच हे सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे शहराची 1 लाखांहून अधिक लोकसंख्या विचारात घेता शहरातील एकल महिलांची कमी प्रमाणात नोंद झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात परिपूर्ण फेरसर्वेक्षण करण्याची गरज असल्याकडे मिलिंदकुमार साळवे यांनी लक्ष वेधले. त्याची दखल घेत तहसीलदार वाघ यांनी नगरपालिका हद्दीत प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य घेऊन शहरातील एकल महिलांची परिपूर्ण माहिती संकलित करण्याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप यांना पत्र देण्याचे निर्देश सदस्य सचिव शिंदे यांना दिले.
शहर व ग्रामीण भागातील सर्वेक्षणातून जमा होणारी एकल महिलांची यादी एकत्रित करून त्यानुसार या महिलांना कोण कोणत्या शासकीय योजना, सोई सवलतींचा लाभ मिळत आहे किंवा नाही, याचे विलेषण करून त्यांना आवश्यक असलेल्या योजना, सवलतींचा लाभ संबंधित विभागांमार्फत देण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार वाघ यांनी सांगितले.
शहर व तालुक्यातील एकल महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन मिळण्यासाठी रोजगार प्रेरणा कार्यशाळा घेण्याची सूचना साळवे व जपे यांनी केली. त्यावर यासाठी निधीची अडचण असल्याची बाब उमेदचे तालुका व्यवस्थापक शेरे यांनी निदर्शनास आणून दिली. या कार्यशाळेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन तहसीलदार वाघ यांनी दिले.