श्रीरामपूर: चालकाचा गणवेश नाहीच, पण वाहन चालविण्याचा परवानाही (लायसन) नाही. सुरक्षेची बोंबा असणाऱ्या वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
उपप्रादेशिक परिवहन विभागाने श्रीरामपुरातील ३३ वाहनांना दंड ठोठावला. पुन्हा अशी चूक करताल तर आणखी मोठी कारवाई, असा इशारा देत समज दिल्यानंतर चालकांना सोडून दिले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या पाहणीसाठी श्रीरामपूर शहरात पोलिस आणि आरटीओचे अधिकारी रस्त्यावर उतरले. स्कुल बस आणि खासगी अशी ६६ वाहने या विभागाने अडवत तपासली.
सुरक्षा साधनांसह फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, विमा, परमिट, प्रदूषण प्रमाणपत्र, चालकाचा वाहन परवाना यांची पडताळणीसोबतच अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा, सीसीटीव्ही, जीपीएस सुविधा आणि वेगमर्यादेचे पालन होत आहे का, याचीही पाहणी करण्यात आली.
तपासणीत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटीचा अभाव दिसून आला. चालकाकडे वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता. प्रदूषण प्रमाणपत्र नसणे, चालकाचा गणवेश नसणे, अतिरिक्त प्रवासी, फिटनेस प्रमाणपत्रातील त्रुटी, आपत्कालीन दरवाजाची समस्या तसेच सुरक्षित काचा व जाळीबाबत नियमभंग करणाऱ्या ३३ वाहनांना दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, राहुरी येथे शालेय बसला अपघात घडला होता. त्यामुळे हा विषय ऐरणीवर असताना श्रीरामपूरप्रमाणे जिल्हा भरात पोलिस प्रशासन आणि आरटीओ विभागाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जावी, अशी मागणी पालकांमधून पुढे येत आहे.
शाळेचीही जबाबदारी
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही केवळ प्रशासनाची जबाबदार नाहीतर ती शाळा, पालक व चालकांचीही आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी करण्यात आली. तपासणीत सातत्य राखले जाईल.
स्कुल व्हॅन व खासगी वाहनांनी नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन करा अशी समज देत आज दंड करून सोडले. सुधारणा न झाल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस आणि आरटीओ पथकाचे स्पष्ट केले.