शिर्डी : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भिक्षेकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस ठाणे, शिर्डी नगरपरिषद आणि साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकऱ्यांविरोधात आज (दि.13) एक विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे 70 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची पुढील रवानगी करण्यात येणार आहे.
श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. भाविक साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आल्यानंतर मंदिराच्या चारही बाजूंनी वेढा घातलेले भिक्षेकरी भाविकांचा पाठलाग करून त्यांना वारंवार त्रास देतात,भिक्षा न दिल्यास भाविकांचे कपडे ओढणे, त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याच्या अनेक तक्रारी भाविकांनी शिर्डी साईबाबा संस्थान, नगरपालिका आणि पोलीस ठाण्याकडे केल्या होत्या.
भाविकांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाकडून अनेक वेळा भिक्षेकऱ्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. आज पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवून 56 पुरुष आणि 14 महिला अशा एकूण 70 भिक्षेकऱ्यांना मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आज पहाटेपासून शिर्डी शहरातून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतल्या नंतर शिर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वांचे छायाचित्र, नाव, गाव आणि ओळखपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर सर्व भिक्षेकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत, यानंतर त्यांना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानुसार महिला भिक्षेकऱ्यांना मुंबई येथे तर पुरुष भिक्षेकऱ्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील विसापूर येथील भिक्षेकरी सुधारगृहात रवाना करण्यात येणार आहे. शिर्डीत श्रध्देने येणार्या भक्तांच्या श्रध्देचा फायदा घेत आर्थिक फायदा करवुन घेतात त्या मुळे वारंवार शिर्डीत वाढणाऱ्या या भिक्षेकऱ्यांच्या मागे एखादी मोठी टोळी अथवा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय शिर्डी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी व्यक्त केला आहे. भिक्षेकऱ्यांनी दिवसभरात गोळा केलेल्या पैशांपैकी त्यांना केवळ दारू किंवा जेवणापुरते पैसे दिले जातात. तर उर्वरित रक्कम त्यांच्या मागील लोकांकडून घेतली जाते असल्याची माहीती असल्याच समोर येतय.
साईभक्तांच्या सुरक्षेसाठी आणि शिर्डी परिसरातील सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ही कारवाई अत्यंत गरजेची होती. त्यामुळे आगामी काळात दर 15 दिवसांनी अशी संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचही उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी स्पष्ट केलय .अभय शेळके, उप नगराध्यक्ष शिर्डी